उदगीर किल्ला
परिचय
उदगीरचा किल्ला हा भुईकोट किल्ला आहे. किल्ल्यात उदागिरबाबाची समाधी आहे. त्यावरूनच गावाला उदगीर हे नाव पडले, असे म्हणले जाते. उदागीर बाबा आणि उदगीरचा किल्ला ह्यामुळे हे शहर प्रसिद्ध झाले. उदगीर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. बालाघाटच्या डोंगरांगांच्या कुशीमध्ये उदगीर हे गाव वसलेले आहे. उदगीर हे कर्नाटकाच्या सीमालगत असल्यामुळे येथे कानडीभाषक लोक बहुसंख्येने आढळुन येतात.
इतिहास
उदगीर शहरावर ८०० वर्ष मुघलांचे राज्य होते. मराठ्यांनी अहमदनगर काबीज केल्यामुळे निजाम मराठ्यांवर चालुन आला. त्यामुळे ११ जानेवारी १७६०ला येथे निजाम विरुद्ध मराठे ही लढाई झाली आणि त्यात मराठ्यांनी निजाम सलाबतजंगाचा पराभव केला. मराठ्यांचे सेनापती सदाशिवरावभाऊ पेशवे होते. या लढाईत मराठ्यांच्या बाजुने लढणाऱ्या इब्राहीमखान गारदीच्या तोफांनी निजामाचे सैन्य भाजुन काढले होते.निजाम शरण आला. निजामाने मराठ्यांशी ३फेब्रु.१७६०ला तह केला. त्याने ६०लक्ष उत्पन्नाचा जहागिराचा मुलुख अशीरगड, दौलताबाद, विजापुर, बर्हाणपुर मराठ्यांना दिला. १० जाने,१७६० रोजी दिल्ली जवळील बुराडीघाटावरील शुक्रतालच्या लढाईमध्ये दत्ताजी शिंदे नजीबखान रोहील्याशी लढतांना ठार झाले. नजीबखान व अब्दालीने दिल्ली ताब्यात घेतली. (जाने १७६०) हे वर्तमान सदाशिवराव भाऊस कळताच निजामाचा पराभव केल्यानंतर परतुर येथे प्रचंड तयारीनिशी १लाख मराठ्यांची सेना सदाशीवराव पेशवे यांचे नेतृत्वात अहमदशहा अब्दालीचे पारीपत्य करण्यासाठी १४ मार्च १७६०ला मराठा फौज दिल्लीकडे निघाली. कारण, मोगल बादशाही महादजी शिंदेंच्या नेतृत्वात मोगल बादशाही मराठ्यांनी नामधारी केली होती. दिल्लीवर मराठ्यांचे पुर्ण वर्चस्व मराठ्यांचे होते. १७५२ च्या दिल्ली करारानुसार मोघल बादशाही रक्षणाची जबाबदारी मराठ्यांकडे होती. पुढे १४जाने.१७६१ला पानिपतची तिसरी लढाई मराठ्यांची अब्दालीशी लढाई होवुन मराठ्यांचा पराभव झाला.
किल्ल्याची पाश्रर्वभूमी
उदगीरपासुन ४६ मैलावर असलेल्या कर्नाटकातील बसवकल्याण येथे चालुक्य घराण्याची सत्ता होती. त्यांनी इ.स.९७५ ते ९९० दरम्यान दक्षिण भारतावर राज्यकारभार केला. इ.स.१३४७ ते १५२७ दरम्यान किल्ला बांधल्याचा उल्लेख तारीख - ए - फेरीश्ता' व 'तारीख - ए - उदगीर या ग्रंथात केला आहे. इ.स.१६३६ मध्ये मुघलसम्राट शहाजहॉं याने उदगीरचा किल्ला जिंकून घेतला. निजाम आणि मराठे यांच्यात ३ फेब्रुवारी १७६० रोजी येथे युद्ध झाले आणि काही कालावधीसाठी उदगीरचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. पानिपतच्या तिसऱ्या लढाईतील मराठ्यांच्या पराभवानंतर दक्षिणेत निजामांनी डोके वर काढले. उदगीरवर हैदराबादच्या निजामाची राजवट रूढ झाली.
खंदक
उदगीरचा हा किल्ला छोट्याश्या टेकडीवर वसला आहे. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी खंदक असुन ते ४० फुट खोल व २० फूट रूंदीचे आहे. खंदकाच्या आत जाण्यासाठी ९० फूट लांबीचा व २० फूट रूंदीचा पूल आहे. खंदकात पाणी राहम्यासाठी उदगीरच्या पश्चिमेकडील तलावातून पाणी सोडण्याची व्यवस्था होती. आता किल्ल्याचे प्रवेश व तटबंदी वगळता मोठ्या प्रमाणात किल्ल्याची पडझड झालेली दिसते. या किल्ल्यात खंदका बरोहरच बुरूज, तोफा, दारूखाना, गुप्तमार्ग, राजवाडा, दिवाण - ए- आम व दिवाण- ए- खास या दोन महत्त्वाच्या वास्तु आहेत. तसेच किल्ल्यातील महाल, जनानखाना, किल्लेदाराची कचेरी व तिजोरी आहे. हमामखाना, मस्जिद, जलव्यवस्थापन आहे. किल्ला पहाते वेळी किल्ल्याची मांडणी अत्यंत नियोजन पुर्वक केलेली दिसते.