औसा
भुईकोट किल्ला
औसा येथे भुईकोट किल्ला असून, त्याचे क्षेत्रफळ २४ एकर ३० गुंठे आहे. किल्ल्याभोवती खंदक असून, ते सध्याही चांगल्या स्थितीत आहे. खंदकात अनेक विहिरी आहेत. खंदकाला लागून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी पहिला मोठा दरवाजा लागतो त्यास "लोह्बंदी" दरवाजा म्हणतात. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर प्रत्येक्ष किल्ल्याच्या पहिल्या तटास "अह्शमा" नावाचा दरवाजा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी हा एकमेव दरवाजा आहे. लोह्बंदी दरवाजा हे पूर्वाभिमुख आहे. किल्ल्यात एकूण दोन तट आहेत. खंदकाचे भिंतीपासून पहिल्या तटाच्या भिंतीपर्यंत साधारणपणे १४० ते २५० फुट अंतर आहे. दुसरया तटाच्या आत इशरतमहाल, लालमहाल, पाणीमहाल इत्यादी अनेक इमारती आहेत. किल्ल्यात पारिबा, कटोरा व चांद या तीन महत्त्वाच्या विहिरी आहेत. बिदरच्या बहमनी राज्याच्या मुख्य वजीर खाजा महंमद गवान याने शके १३८२ला औसा किल्ला बांधण्यास सुरुवात केली व शके १४०३ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले.
किल्ल्याचे राजकीय महत्त्व
शहरातील किल्ल्याला ऐतेहासिक काळात राजकीय महत्त्व होते. हा शहराला यादवपूर्ण काळापासून महत्त्व होते. इ.स. १३५७ मध्ये बहमनी सुलतानने येथे आपली सत्ता स्थापन केली. या किल्ल्यावर पुढे इ.स. १५४० मध्ये पहिला बुऱ्हाण निजामशहा याने ताबा मिळविला होता. निजामशाही विरुद्ध आदिलशाही आणि मोगल यांच्यात इ.स. १६३५ मध्ये झालेल्या तहाच्या फर्मानात औश्याची नोंद आहे. मोगल बादशहा शाहजहान याच्या खास आदेशाप्रमाणे हा किल्ला जिंकून घेतला होता. मराठ्याच्या स्वातंत्र्य युद्धात धनाजी जाधव आणि मोगल सेनापती झुल्फिकार खान यांच्यात या भागात अनेक चकमकी झाल्या होत्या. हैद्राबादच्या निजामी संस्थानकडून १८५३ मध्ये इंग्रजांनी हा भाग गहाण म्हणून घेतला होता. त्यांचा ताबा ह्या भागावर १८६१ पर्यंत होता. त्यावेळी कर्नल मेडीज टेलर हा ब्रिटिश कमिशनर म्हणून नळदुर्ग परगाण्याचा प्रमुख होता. त्याच्या निवासाची वास्तू किल्ल्याजवळ आहे. त्याने अंगुरबाग, जामबाग इत्यादी महत्त्वाच्या बागा लावल्या होत्या. त्या आजही या शहरात प्रसिद्ध आहेत.
प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे
श्री औसेकर महाराज मठ (नाथसंस्थान) बालाजी देवस्थान, गोपाळपूर. श्री मुक्तेश्वर मंदिर.